लेंडी प्रकल्पाला जलसंपदा विभागाकडून गती; 3 गावातील 329 कुटुंबाच्या स्वेच्छा पुनर्वसनाबाबत शासन निर्णय -Wadhona


नांदेड।
महाराष्ट्र व तेलंगणा राज्यातील संयुक्त प्रकल्प असलेल्या लेंडी प्रकल्पाला जलसंपदा विभागाने गती दिली आहे. राज्यात भूमीसंपादन, पूनर्वसन व पूर्नस्थापना करतांना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम 2013 लागू करण्यात आला. यातील नियम क्रमांक 108 नुसार स्वेच्छा पुनर्वसनाबाबत तरतूद करण्यात आली. त्यानुसार लेंडी प्रकल्पातील ईटग्याळ गावातील 165 कुटूंब, कोळनूर गावातील 30, वळंकी गावातील 134 अशा एकुण 329 कुटुंबासाठी सुमारे 16 कोटी 42 लाख रुपये आवश्यक अनुदान मंजूर करण्याचा शासनाने निर्णय निर्गमीत केला.

नांदेड जिल्ह्याच्या तेलंगणा सीमेवर असलेल्या देगलूर, मुखेड सह तेलंगणातील मदनूर भागातील शेतकऱ्यांना या प्रकल्पामुळे पिण्याच्या पाण्यासह दोन पिकांची हमी मिळणार आहे. या प्रकल्पाचे 80 टक्के काम पुर्ण झाले असून घळभरणीचे काम प्रलंबित आहे. प्रकल्पाच्या संयुक्त कालव्याची कामे पूर्णत्वास आली आहेत. 14 दरवाजांपैकी फक्त 4 द्वार उभारणीचे काम बाकी आहे. सन 2021 पासून पुर्नवसनाबाबत प्रकल्पग्रस्तांनी केलेल्या मागण्यांच्या पूर्ततेअभावी हे काम स्थगित होते. या प्रकल्पामुळे 26 हजार 914 हेक्टर जमिनीला सिंचनाचा लाभ होणार असून यातील 15 हजार 710 हेक्टर क्षेत्र देगलूर व मुखेड तालुक्यातील असल्याची माहिती जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता बी. के. शेटे यांनी दिली.

Post a Comment

أحدث أقدم
wadhonanews/जनसामान्यांचा बुलंद आवाज
wadhonanews/जनसामान्यांचा बुलंद आवाज